कर्जाचे ओझे फेडायचे कसे? म्हणुन तरूण शेतकऱ्याने केली आत्महत्या

मूल तालुक्यातील गांगलवाडी येथील घटना

मूल (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसापुर्वी मूल तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्याचे पिक हातातुन गेले, हातात येणारे पिक अतिवृष्टीमुळे वाहुन गेल्याने जिवनात नैराष्य आलेल्या एका युवा शेतकऱ्याने तलावात उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना मूल तालुक्यातील डोंगरगांव येथे 23 ऑगष्ट रोजी सकाळी उघडकीस आली. संजय जनार्धन चिचघरे वय 38 वर्षे रा. गांगलवाडी असे आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याचे नांव आहे.

मूल तालुक्यात मागील काही दिवसापुर्वी सततधार पाऊस पडला, यापावसामुळे हातात येणारे पिक यावर्षी हातातुन गेल्यानेे कर्ज फेडायचे कसे याविवंचनेत तालुक्यतील गांगलवाडी येथील युवा शेतकरी संजय जनार्धन चिचघरे हा होता, तो 22 ऑगष्ट रोजी रात्री पानठेल्यावरून खर्रा खावुन येतो असे पत्नीला सांगुन गेल्यानंतर आज सकाळ पर्यंत परत न आल्याने त्याची पत्नी आणि नातेवाईकांनी सगळीकडे शोधाशोध सुरू केली. दरम्यान गांगलवाडी पासुन जवळच असलेल्या डोंगरगाव तलावात एका इसमाचे प्रेत तरंगत असल्याचे काही गावकऱ्याना दिसले. काहींना ओळख पटल्याने सदर घटनेची माहिती संजयच्या घरच्यांना देण्यात आली.

मागील अनेक दिवसांपासून संजय चिंतेत असल्याचे सांगितले जाते. यावर्षीचा अतिपावसामुळे मूल तालुक्यातील बहुतांश भागातील धान पीक नष्ट झाले. संजयच्या शेतीची पण धुळधान झाल्याने कर्ज आणि इतर देणी कोठुन द्यायचे ? या विवंचनेत तो सारखा असल्याने अखेर त्याने आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचे सांगितले जात आहे. घटनेचा तपास मूल पोलीस करीत आहेत.