मृतकाच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री निधीतून 5 लाख रूपयाचे अर्थसहाय्य जाहीर

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विनंती मुख्‍यमंत्र्यांनी केली मान्‍य

चंद्रपूर (प्रतिनिधी) : बल्लारपूर रेल्‍वे स्‍टेशनवर पादचारी पुल कोसळल्‍याने झालेल्‍या दुर्घटनेतील मृत्तक श्रीमती रंगारी यांच्या कुंटूंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्‍याचप्रमाणे जखमींवर योग्‍य उपचार शासकीय खर्चाने करण्‍याचे निर्देश त्‍यांनी जिल्‍हा प्रशासनाला दिले आहेत.

रविवारी दुर्घटनेनंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्‍थळाला भेट दिली व सामान्‍य रुग्‍णालय चंद्रपूर येथे भेट देत जखमींची विचारपूस देखील केली. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याशी संपर्क साधुन मृतकाच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रूपयांचे अर्थसहाय्य प्रदान करण्‍याची विनंती केली. त्‍यानुसार मुख्‍यमंत्र्यांनी 5 लाख रूपयांचे अर्थसहाय्य मृतकाच्‍या कुटूंबियांना जाहीर केले आहे.