म्हशीने वाचविले मालकाचे प्राण

सावली (प्रतिनिधी) : मानव व वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढतच असल्याचे नेहमीच होणाऱ्या घटनेवरून दिसून येत आहे. अशीच एक घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कोंडेखल गावाला लागून असलेल्या शिवारात घडली. एका शेतकऱ्यासमोर चक्क तीन वाघ उभे ठाकले. लगेच शेतकरी झाडावर चढला. याच वेळी एका म्हशीने झाडावर चढलेल्या आपल्या मालकाचे प्राण वाचविले.

तालुक्यातील कोंडेखल येथील शेतकरी लोकेश अंबादास भोयर आपली पाळीव जनावरे घेऊन नवतलाव परिसर असलेल्या स्वत:च्या शेतात चराईसाठी गेला. जनावरे चराई करत असताना, बऱ्याच वेळाने तीन वाघ समोर येऊन उभे ठाकले. प्रसंगावधान राखून त्याने लगत असलेल्या झाडावर चढला. त्यानंतर, एका म्हशीने आक्रमकता दाखवत एका वाघाचा एका किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग केला. तो पट्टेदार वाघ पळून गेला. नंतर दोन वाघ झाडाखाली बसून होते. सोबत असलेले बैल सैरावैरा पळाले.

दरम्यान, म्हैस येऊन त्या दोन्ही वाघांकडे बघत राहिली. वाघ म्हशीकडे बघत होता. तोपर्यंत शेतमालक झाडावर चढून हे दृश्य पाहतच होता. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या मालकाने गावातील नागरिकांना फोन केला.
गावातील ७० ते ८० नागरिकांनी लगेच शेताकडे धाव घेतली, तोपर्यंत वाघ झाडाखाली बसून होते. गावकऱ्यांचा आवाज ऐकू येताच, दोन्ही वाघ जंगलाच्या दिशेने पळाले. नशीब बालवत्तर होते, म्हणून त्या युवा शेतमालकाचे प्राण वाचले. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या इसमाला ग्रामस्थांनी खाली उतरवले. नंतर वन समितीच्या अध्यक्षांनी वनविभागाला याबाबत माहिती देत बंदोबस्त करण्याची मागणी केली.