सर्पदंश व जंगली रानडुकराच्या हल्ल्यात मृत झालेल्या शेतकरी कूटुंबीयांना आर्थीक मदत

चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा शाखेतर्फे मदत

अतुल कोल्हे भद्रावती 
आधीच परीस्थिती जेमतेम व त्यात घरचा कर्ता पुरुष गमावल्यावर पत्नी व मुलबाळ निराधार होतात. जगण्याची उमेद ढासळते. अशा परीस्थितीत जगण्याला पाठबळ लागते. व त्यासाठी समाजातील दातृत्व जपणा-या संस्थांची गरज पडते. शेतक-याच्या सदैव पाठीशी राहणारी जिल्हा बँक शेतक-याच्या अस्मानी व सुल्तानी संकटात नेहमी धावून आली आहे. जिल्हा बँकेच्या ‘शेतकरी कल्याण नीधी’ योजनेअंतर्गत गरजु, निराधार, शेतकरी, शेतमजुरांना नुकसान भरपाई देवून दातृत्व जपत आहे.

भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा या गावातील कासाबाई कामडी हीचे पती गोपीचंद कामडी यांचे सर्पदंशाने अकस्मात निधन झाले. काटवल (तू.) या गावचे शेतकरी राजेंद्र कीर्तने यांना रानडूकराने हल्ला केला, त्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला. पारोधी या गावचे शेतकरी राहुल माडेकर यांना शेतामध्ये काम करीत असतांना त्यांचेवर रानडुकराने हल्ला केला व त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. अशा वन्यजीव व मानव संघर्षात बळी पडलेल्यांच्या शेतकरी कुटूंबांना चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा शाखेतर्फे आर्थीक मदत करण्यात आली.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चंदनखेडा शाखेच्या सौजन्याने बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत व डॉ. विजय देवतळे यांचे सहकार्याने व स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा बँकेचे माजी अध्यक्ष व विदयमान संचालक रवींद्र शिंदे यांचे हस्ते कासाबाई गोपीचंद कामडी, स्व. राजेंद्र कीर्तने यांची पत्नी व राहुल माडेकर यांना बँकेचे ‘शेतकरी कल्याण नीधी’ योजनेअंतर्गत मदतीचा धनादेश वितरीत करण्यात आला.

यावेळी मुन्ना शेख , बाळासाहेब पडवे, मनीषा कीर्तने, राहुल माडेकर, चरणदास बागेसर, खिरटकर, कासाबाई कामडी, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक रवींद्र शिंदे यांनी बँकेच्या विविध कल्याणकारी योजना असुन कास्तकारांनी व शेतमजुरांनी त्या योजनांचा लाभ घ्यावा, असे सांगितले.

सोबतच ट्रस्ट तर्फे सुरु असलेल्या कामांची व योजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील कोरोनाने मृत झालेल्या पालकांच्या, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व गरीब-गरजु कूटुंबातील पाल्यांच्या विवाहाचा खर्च ट्रस्ट करणार असुन त्याबाबतची नोंदणी अभियान सुरु झाले आहे. अनेक नोंदणी अर्ज प्राप्त झाले असुन लवकरच कोरोना प्रादुर्भावाची परीस्थिती निवळताच विवाह मेळावा आयोजित करु, तरी इच्छुकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे सांगितले. निराधार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च ट्रस्ट उचलत आहे. तेव्हा गरजुंनी ट्रस्टच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रवि शिंदे यांनी यावेळी केले.