समाज नेहमी आठवण करीत राहील असे कार्य शिक्षकांकडून घडले पाहिजे

नामदेवराव कोल्हे यांचे प्रतिपादन

अतुल कोल्हे (भद्रावती)
समाज नेहमी आठवण करीत राहील असे कार्य शिक्षकांकडून घडले पाहिजे असे प्रतिपादन येथील लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालन करणाÚया लोकसेवा मंडळाचे सहसचिव नामदेवराव कोल्हे यांनी केले. ते येथील लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित स्व.नीळकंठराव उपाख्य अण्णाजी गुंडावार यांच्या जयंती निमित्त आयोजित १६ व्या व्याख्यानमालेत ‘शाळेची वाटचाल आणि सामाजिक बांधिलकी’या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

सदर विषयावर पहिले पुष्प गुंफले गेले. यावेळी त्यांनी स्व. अण्णाजींच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीबांना सहकार्य करु शकलो, तरच खÚया अर्थाने स्व.अण्णाजींना आदरांजली वाहिल्यासारखी होईल. स्व. अण्णाजींनी भद्रावती परिसरातील गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी 1951 साली शाळा सुरू केली. या शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले वि‌द्यार्थी आज मोठ-मोठ्या हुद्यावर आहेत, असेही ते म्हणाले.

लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे आद्य संस्थापक अध्यक्ष स्व. नीळकंठराव गुंडावार यांच्या जयंती समारोहाचे अध्यक्ष म्हणून लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार होते.तर प्रमुख अतिथी म्हणून लोकसेवा मंडळाचे सचिव मनोहरराव पारधे, सहसचिव नामदेवराव कोल्हे, शाळा समिती अध्यक्ष उल्हास भास्करवार, लोकसेवा मंडळाचे सदस्य संजय गुंडावार, उमाकांत गुंडावार, गोपाल ठेंगणे, संजय पारधे, आशिष गुंडावार, अमित गुंडावार, प्राचार्य बंडू दरेकर प्रभृती उपस्थित होते. कोरोनाचे सर्व नियम पाळून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सर्वप्रथम माता सरस्वती आणि स्व.अण्णाजी यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी लोकसेवा मंडळाचे सहसचिव तथा प्रमुख वक्ते नामदेवराव कोल्हे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच उल्हास भास्करवार व प्रा.सचिन सरपटवार यांनी स्व.अण्णाजींच्या कार्याबद्दल व संस्थेबद्दल माहिती दिली. यावेळी विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे स्व. अण्णाजींच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणातून चंद्रकांत गुंडावार यांनी स्व.अण्णाजींनी सामाजिक समरसतेच्या भावनेतून केलेले कार्य अधोरेखित केले. तसेच अण्णाजींनी विविध जाती-धर्माच्या लोकांना बिकट परिस्थितीत आश्रय देऊन कसे सहकार्य केले हे पटवून दिले.

यावेळी प्रा.अस्मिता झुलकंठीवार आणि संच यांनी शारदा स्तवन आणि अण्णाजींच्या जीवनावर आधारित गौरव गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बंडू दरेकर यांनी केले. संचालन शिक्षक राजेश्वर मामिडवार यांनी केले. तर आभार उपप्राचार्य आशालता सोनटक्के यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, माजी प्राचार्य आणि शिक्षक उपस्थित होते.