अध्यक्ष जितेंद्र टिंगुसले यांचा आरोप
मूल (प्रतिनिधी) : मालधक्क्यासाठी होणाऱ्या आयरन खनिज वाहतुकीमुळे मत्स्य व्यवसायिकांवर उपासमारीची पाळी येणार असल्याचा गंभीर आरोप वाल्मिकी मत्स्यपालन सहकारी संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र टिंगुसले यांनी केला आहे. Jitendra Tingusle
सुरजागड येथून लाल रंगाचे आयरन खनिज मूल शहरातील मालधक्क्यावर नेण्यासाठी मामा व विहीरगांव तलावालगतच्या मार्गाने वाहतूक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. संस्थेच्या मते, या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात खनिज धूळ तलावात मिसळून पाण्याचे प्रदूषण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तलावातील मासे मृत्यूमुखी पडून मत्स्य उत्पादन पूर्णपणे ठप्प होऊ शकते. याचा थेट परिणाम सुमारे साडेसातशे ढिवर समाजातील सभासदांच्या उपजीविकेवर होणार आहे. Mul
मामा व विहीरगांव तलाव हा संस्थेचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत असून, तो प्रदूषित झाल्यास संपूर्ण समाजावर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून या मार्गावरील खनिज वाहतुकीस स्थगिती द्यावी किंवा पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. Mama Lake
स्थानिक नागरिकांनीही या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली असून, पर्यावरण व मत्स्यव्यवसाय वाचवण्यासाठी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. Chandrapur









